पंचवटी परिसर झाला असुरक्षित ; दुचाकीसह पायी चालणे झाले अवघड !
रस्त्यावरून पोलीस गायब झाल्याने चोरट्यांचा धिंगाणा !अवैध धंदे वाढल्याने परिसरात चोऱ्यांच्या संख्येत वाढ !चोरट्यांचा पोलीस असल्याचा बनाव ! लाखोंचा ऐवज लंपास !
नाशिक : पंचवटी परिसरातील पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावरून गायब झाल्याने रस्त्यावर चोरांचे साम्राज्य दिसू लागले आहे. तीन घटनांमध्ये चोरटयांनी जवळपास सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात पोलीस असल्याचा बनाव करीत एका वृद्धाचे लाखो रुपयांचे दागिने लांबवले आहे. तर, दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून महिला घरी जात असताना थेट चालत्या गाडीवर सोनसाखळी चोरटयांनी दोन लाखांची सोनसाखळी चोरून नेली आहे. तर तिसऱ्या घटनेमध्ये मावस भावाच्या लग्नाला जाणे एका कुटुंबाला चांगलेच महाग पडले असून, घरफोडीमध्ये चोरटयांनी साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यामुळे पंचवटी परिसरात पोलिसांचे नव्हे तर चोरट्यांचे राज्य असल्याचे दिसू लागले आहे. परिसरात अवैध धंदे वाढल्याने चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. यावर पोलीस आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन परिसरातील अवैध धंदे बंद करून गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक हॉटेलांमध्ये सर्रास दिवसरात्र बेकायदेशीरपणे दारू विकली जात आहे. तसेच, दारू पिण्यासाठी मद्यपीना जागा देखील उपलब्ध करून दिली जात असल्याने या संपूर्ण परिसरात संध्याकाळनंतर मद्यपींचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर, याच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अंमली पदार्थ विकले जात आहे. तसेच, घरगुती गॅसचा काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातून पोलीस मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पंचवटी पोलिसांनी तर अवैध धंदे चालक आणि पोलीस जणूकाही भाऊबंद असल्याचे दाखवून दिले आहे. कारण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चोरून लपून नव्हे तर थेट पोलीस चौक्यांच्या आशीर्वादाने सुरु करण्यात आले आहे. अनेक अवैध धंदे पोलीस चौकी सामोरं किंवा पोलीस चौकीशेजारी सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना या अवैध धंदे चालकांची तक्रार करावी तरी कुणाकडे असा प्रश्न पडला आहे. पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती दिल्यास तात्काळ संबंधित अवैध धंदे चालकाला तक्रारदाराचे नाव, नंबर कळविले जाते. त्यामुळे तक्रारदाराला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच पोलीस आणि अवैध धंदे चालकांची अभद्र युती असल्याचे जाहीर होत असून, यातून पोलिसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन होत आहे. याकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.





