राजकीय उद्दिष्ट साधण्यासाठी पोलिस यंत्रणेचा बळी दिला जातोय का…???
का होतेय खाकी बदनाम ?नाशिककरांच्या मनात पूर्वी इतकीच प्रतिष्ठा कधी निर्माण होणार ?
नाशिक : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक आली रे आली की परस्परांविरोधात आरोप प्रत्यारोप होणे हे काही जनतेसाठी नवीन नाही. मात्र, यामध्ये निष्कारण म्हणा किंवा हेतू पुरस्कर म्हणा कुठेतरी नाशिकच्या पोलिसिंगवर संशय व्यक्त केला जात असल्याने खाकी बदनाम होऊ पाहत आहे. पोलीस कारवाई करताना दुजाभाव करीत सामन्यांवर कारवाईचा बडगा उगारत संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याच्या चर्चा शहरात चौकाचौकात सुरु आहे. त्यामुळे सध्या नाशिकची पोलिसिंग देखील संशयास्पद काम करीत असल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबारातील आरोपी अचानक विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांना सापडू लागले असून, त्यात बड्या राजकीय व्यक्तीच्या मुलाचा सहभाग उघड करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकचे राजकारण तापू लागले आहे. मात्र, नाशिकचा इतिहास हा आहे की, एखाद्या राजकीय व्यक्तीचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे नशीब नक्कीच चमकते हे नाशिककरांनी चांगलेच अनुभवले आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यात पोलीस प्रशासनाने खाकीला डाग लागू नये याची पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या नेमके काय चालू आहे ते बघू.
दोन वर्षांपूर्वी नाशिक मधील आरपीआयचे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या होत्या. यात जाधव यांच्या मांडीला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. याबाबत अज्ञात हल्लेखोरां विरोधात अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला जात होता. मात्र मागील काही दिवसात अचानक या तपासाला वेग आला आणि अज्ञात हल्लेखोरांना शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. यात सहा संशयित आरोपींना नाशिक शहर पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहातून तसेच फरार संशयीतांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून चौकशीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचे म्हणजेच दीपक बडगुजरचे नाव निष्पन्न करण्यात आल्याने शहरात व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सध्या दीपक बडगुजर हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. दीपक बडगुजर याच्यावर प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला जात आहे. निश्चितच प्रकरण गंभीर आहे यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. मात्र, या गुन्ह्याच्या तपासात स्पष्टता असायला हवी तसेच कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडतात निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी चर्चा सध्या शहरात सुरू झाली असून पोलिसांनाच नागरिकांकडून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. याचा विचार किमान नाशिक पोलिसांनी करायला हवा.
त्यानंतर या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला मारहाण झाल्याचे आरोप स्वतः आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी केले आहे. दीपक बडगुजर याचे नाव राजकीय दबावामुळे गोवल्या जात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात उत्तम संघटन करणाऱ्या जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना कमकुवत करण्यासाठी विरोधकांकडून राजकीय खेळी केली जात असल्याचे देखील आरोप होत आहे. यात सत्यता किती हे येत्या काळात स्पष्ट होईल यात शंका नाही. मात्र, सत्ता येत जात असते राजकारण हे राजकारणाप्रमाणेच व्हायला हवे, राजकीय आकसापोटी एखाद्या नेत्याला व त्याच्या कुटुंबीयांना उध्वस्त करणारे राजकारण व्हायला नको याची देखील तितकीच खबरदारी घ्यायला हवी म्हणजे राजकारण आणि तपास यंत्रणा बदनाम होणार नाही हे हे दिसून येईल.
तसेच, या गुन्ह्याबाबत विविध चर्चा रंगत असतानाच ॲड. मनोज आहेर यांनी पोलीस आयुक्तांना गुन्ह्यातील फिर्यादी प्रशांत जाधव यांच्या विरोधात खळबळजनक आरोप करणारे निवेदन दिले आहे. ज्यामध्ये जाधव यांच्यावर वकिलीची सनद घेताना दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गोमांस प्रकरणात जाधव यांनी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर करून पैसे उकळल्याबाबत त्यांच्यावर दाखल खंडणीचा गुन्हा, अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने त्यांच्या जाचाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे अनेक धक्कादायक आरोप फिर्यादी प्रशांत जाधव यांच्यावर करण्यात आले आहे. मात्र, याबाबत प्रशांत जाधव यांना विचारले असता सर्व आरोपांचे त्यांनी खंडन केले असून लवकरच आपण अर्जदारा विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांच्या घडामोडींवर माध्यमांच्या भूमिकेवर देखील नाशिककरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पेड न्यूज, व्यावसायिक पत्रकारिता आणि फक्त प्रेसनोट जशीच्या तशी छापणे म्हणजे पत्रकारिता झाली आहे का असा प्रश्न नाशिककर विचारू लागले आहे. या गुन्ह्यात पोलीस देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असताना त्यांना कोणीही प्रश्न विचारात नसल्याने आणि रोखठोक भूमिका मांडली जात नसल्याने चौथ्या स्तंभावर असलेला विश्वास उडू लागल्याने सामान्य नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यायाची याचना करीत आहे. तसेच, अनेक गंभीर प्रकरणाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाळली जात आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यापासून पोलीस प्रशासन अलिप्त असल्याची भावना नागरिकांमध्ये रुजविणे गरजेचे आहे. नाहीतर सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही.





