आम्ही इथले भाईलोक म्हणत बाप-लेकास बेदम मारहाण !
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्यांना काम करणे झाले अवघड !पोलीस प्रशासनाचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाल्याची चर्चा !
नाशिक : नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. गुन्हेगारांचे साम्राज्य इतके वाढले आहे की, शहरातील पोलीस अधिकाऱ्यांवर देखील हे गुन्हेगार प्राणघातक हल्ला करण्यास मागेपुढे बघत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना गुन्हेगारांच्या भाईगिरीमुळे आपले काम करणे अवघड बनले आहे. अशीच एका घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वाहनांच्या पार्किंगचे पैसे मागितले म्हणून गुंडानी थेट बापलेकाला गंभीर मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये बापलेक फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्या अंगावर सैतानी पद्धतीने मारल्याच्या खुणा दिसत आहे.
याबाबत पीडित दीपक आनंद यशवंते, ५७, रा. सिद्धार्थ नगर, नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक यांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, रविवार दि. ८ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजय-ममता सध्याचे फेम चित्रपट गृह येथे मी आणि मुलगा विकी यशवंते आम्ही दोघे ड्युटीवर हजर होतो. यावेळी काही युवकांनी आपली वाहने लावल्याने त्यांच्याकडे दीपक यशवंते यांनी पार्किंगचे पैसे मागितले. याचा राग आल्याने या संशयीत टोळक्याने शिवीगाळ करत आम्हाला ओळखतो का ? आम्ही इथले भाईलोक आहोत, आम्ही मंगेश मोरेचे कार्यकर्ते आहोत तू आमच्याकडे पैसे मागितलेच कसे असे म्हणत लाकडी दांडके, लोखंडी पाईपाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये दीपक यशवंते यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांचा मुलगा विकी याला देखील गंभीर मारहाण करण्यात आली आहे.
या बाप-लेकांना मारहाण किती आणि कशा निर्दयतेने केली असावी याचा अंदाज त्यांच्या अंगावर उठलेल्या मारहाणीच्या खुनांवरून दिसून येत आहे. या दोघांच्या अंगावर लाल-काळे व्रण उठले आहे. फक्त अंगाची चमडी निघण्याची बाकी राहिल्याचे दिसून येत आहे. एखाद्या सिनेमातील मारहाणीच्या दृश्याप्रमाणे या बाप-लेकांना या गावगुंडांच्या टोळक्याने जनावरासारखी बेदम मारहाण करीत घटनास्थळावरून पळ काढला आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित राहिले नसतील त्या शहरातील सामान्य नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. अशी अवस्था नाशिकच्या पोलीस प्रशासनाची झाली आहे. कारण शहरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरी, घरफोडी, जबरी लूट, खून, प्राणघातक हल्ले, पोलिसांवर हल्ले, दुचाकी-मोबाईल चोरी, प्रवाशांची लूट अशा गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिला तर घरासह दुकानात देखील सुरक्षित राहिलेल्या नाही. कारण सोनसाखळी चोरटे थेट अंगणात आणि दुकानात येऊन महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे लुटून घेऊन जात आहे. अशा सोनसाखळी चोरांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर हे सोनसाखळी चोरटे आणि त्यांचे नातलग थेट हल्ले करीत असल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे.
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील सर्वसामान्यांसह माध्यम प्रतिनिधी, नोकरदार, चाकरमाने आणि आश्चर्य म्हणजे पोलीस देखील सुरक्षित नसल्याचे अलीकडच्या काळात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधून सिद्ध झाले आहे. यामुळे नाशिक शहराची पोलिसिंग कुचकामी झाली आहे अशी चर्चा चौकाचौकात रंगू लागली आहे. पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर अंकुश आणण्यास असमर्थ झाली असून पोलिसांचा धाक कमी झाल्यानेच शहरातील गुन्हेगारीने आपला उच्चांक केला आहे. यापूर्वी कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी काही महिन्यांपासून शहरात जाणवू लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन नागरिकांच्या काही समस्या सोडविण्यात यशस्वी होतांना दिसत असले तरी दुसरीकडे गंभीर गुन्ह्यांची वाढ होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.





