पोलीस नव्हे शहरात गुन्हेगारांचेच साम्राज्य !
दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्यामुळे पोलीस यंत्रणेचे वाभाडे !पडद्याआडून गुन्हेगारांना पोलीस संरक्षण देत असल्याची चर्चा !
नाशिक : नाशिकची पोलिसिंग किती रसातळाला गेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवसाढवळ्या अंबड परिसरात टाकण्यात आलेला सशस्त्र दरोडा. दरोडा टाकून तिघे दरोडेखोर एकाच बुलेटवर फरार होत असताना त्यांना शहरातील एकाही चौकात पोलिसांकडून अटकाव करण्यात आला नाही का असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. कारण सध्या चौकाचौकात अनेक सामान्य नाशिककरांना वाहतूक पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अजूनच भर पडली आहे. नाशिकच्या फेल झालेल्या पोलिसिंगला काही पोलीस अधिकारीच कारणीभूत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण गोळीबार, तडीपार गुन्हेगारांकडून खंडणीसाठी तोडफोड करून देखील गुन्हे दाखल केले नसल्याने एकप्रकारे या अधिकाऱ्यांनी थेट गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम पडद्याआडून सुरु केले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पोलीस प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे शहरात पोलिसांचे नाहीतर गुन्हेगारांचे साम्राज्य असल्याची चर्चा चौकाचौकात सुरु झाली आहे.
पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ठासून सांगण्याचे कारण म्हणजे शहरात लावण्यात आलेले विनापरवानगी बेकायदेशीर गुन्हेगारांचे फलक. उच्च न्यायालयाचा अवमान करून हे फलक पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून उभे करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने पोलिसांना थेट अशा बेकायदेशीर फलकबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना देखील पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढणार यात तिळमात्र शंका नाही. खून, प्राणघातक हल्ले, गोळीबार, टोळीयुद्ध करणाऱ्या संशयित गुन्हेगारांचे फलक बघून सामान्य नाशिककर स्वतःला असुरक्षित समजू लागला आहे. मात्र, याचे कुठलेही सोयर सुतक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक किंवा त्यांच्या सुभेदारांना नसल्याचे दिसत आहे.





