भाजप सरकारने राज्यातील शिक्षणाची वाट लावली !
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन !
शिक्षण वाचवण्यासाठी सरकार बदलण्याचे आवाहन !
नाशिक : भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केला आहे. सरकारने दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवत आहेत. हे सरकार बदलल्या शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत. असे आवाहन करत जिल्हयासह शहरातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन केले.
मंगळवार दि. ८ रोजी सकाळी हे आंदोलन जिल्हाधिकार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करण्यात आले. यावेळी आंदोलनाची माहिती देताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे शहराध्यक्ष भावनेश राऊत, जिल्हाध्यक्ष तुषार जाधव व प्रदेश सचिव रमीज पठाण यांनी सांगितले की, कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील १४ हजाराहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे, जिल्हा परिषदेच्या या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय नुकताच भाजप सरकारने घेतला आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधा गणवेश या सरकारला देता आला नाही, राज्यातील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक या सरकारला नेमता आलेले नाहीत, जे शिक्षक नेमले आहेत ते कंत्राटी स्वरूपात नेमले आहेत आणि या शिक्षकांना देखील गेल्या दीड दोन वर्षांपासून पगार दिलेला नाही. यावर्षी तर या तंत्रनिकेतन महाविद्यालयात अजून पर्यंत शिक्षकच नेमलेले नसल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. हे सरकार बदलले नाही तर राज्यातील विद्यार्थी देशोधडीला लागतील. म्हणून शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनावेळी करण आरोटे, पंकज दाते, आकाश अहिरे, दर्शन भोसले, सिद्धांत कोठुळे, तेजस पवार, ऋषी ढवळे, कृष्णा मुंडे, मेहुल धात्रक, वरद जगताप, सुमित पाटिल, चैतन्य भांगरे, प्रणव चंदने, गणेश कसबे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.





