शहर पोलीस दलात वाढत्या गुन्हेगारीचे ओंगळवाणे दर्शन !
पोलीस आणि गुन्हेगारांची अभद्र युतीमुळे नाशिकची शांतता भंग !मंत्री महोदयांसमोर अवैध धंद्यांचे प्रदर्शन !
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक पोलीस प्रशासन चांगलेच चर्चेत आले आहे. पहिले तर शहरात वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल आलेले अपयश आणि त्यानंतर थेट पोलीस दलातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरू लागली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाला कोणाचाही वचक उरलेला दिसत नाही. राज्याचे कॅबिनेट मंत्री ज्या मार्गावरून पायी जाणार होते. त्या मार्गातील सर्व अवैध धंदे उघडे ठेवून पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सुभेदारांनी आपल्या मनमानीचे दर्शन घडवून मंत्र्यांचे देखील नाशिकमध्ये काहीच चालत नसल्याचे दाखवून दिले आहे. तसेच, गुन्हेगारांसोबत ओली पार्टी करताना कर्मचारी रंगेहात सापडल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय रंगला आहे. त्यामुळे नाशिकच्या पोलीस प्रशासनाला एखाद्या दबंग अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा चौकाचौकात रंगू लागली आहे.
नाशिक शहरात आजतागायत पहिल्यांदाच इतकी गुन्हेगारी फोफावल्याचे दिसत आहे. शहरात दिवसाआड मुडदे पडू लागले आहे. तर दुसरीकडे संपूर्ण शहरावर अनाधिकृत आणि बेकायदेशीर फलकबाज गुन्हेगारांमुळे शहरावर गुंडाराज असल्याचे सामान्य नागरिकांना वाटू लागले आहे. तर, घरफोड्या, जबरी लूट, दुचाकी चोरी, भाविकांची लूटमार, प्रवाश्यांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणे लंपास करणे, मारहाण, प्राणघातक हल्ले, अवैध धंदे, जुगार अड्डे, अंमली पदार्थ विक्रीचे अड्डे राजरोसपणे भररत्यावर आणि चौकाचौकात दिसू लागले आहे. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत फक्त आर्थिक हितसंबंध जोपासत सुरु असल्याचे वेगळे सांगायला नको. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक राहिला नसल्याने पोलीस दलातच गुन्हेगारी वाढीस लागली आहे.
पोलीस हवालदार युवराज शांताराम पाटील याचा भद्रकाली, इंदिरानगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांशी मोबाईलद्वारे वारंवार संपर्क आणि संभाषण झाले आहे. तसेच, इंदिरानगर, भद्रकाली पोलीस ठाणे येथे गोवंश मांस विक्री, वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांशी मोबाईलद्वारे कायम संपर्क आणि संभाषण झाले असल्याचे दिसून आले आहे. तसेच, इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थ गुन्ह्यात पाटील याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याचा पाहिजे आरोपी म्हणून समावेश करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाटील हा अंमली पदार्थ विक्रीमध्ये सहआरोपी करण्यात आल्याने त्याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुखत्यारसिंग उर्फ मुकेश नारायणसिंग राजपूत आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर तुकाराम पाटील यांच्यात पोलीस ठाण्याच्या आवारातच अवैध धंद्यांच्या वसुलीच्या वादातून एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती. त्यानंतर दंगा नियंत्रण पथकात कार्यरत असणारा पोलीस अंमलदार चंद्रकांत दळवी याने एका एका युवतीवर पाच वर्ष अत्याचार केले. नंतर तिचा विवाह झाल्यानंतर देखील पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तर थेट पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांसोबत ओली पार्टी केल्याचे उघड झाले आहे. खुनाच्या गुन्ह्यासह अन्य गंभीर गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयातून पुन्हा जिल्ह्या कारागृहात घेऊन जाताना कैदी पार्टीचे हवालदार पद्मसिंह राऊळ, अंमलदार दीपक जठार, विक्की चव्हाण, गोरख गवळी पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये ओली पार्टी करीत होते. हि बाब एका जागृत नागरिकांच्या नजरेस पडताच त्याने हि बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. यावेळी याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकून चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना ओली पार्टी करताना रंगेहात पकडले. यामुळे पोलीस दलाची इभ्रत चांगलीच वेशीला टांगली गेली आहे.
सध्या नाशिकला पालकमंत्री पद दिले गेले नसल्याने नाशिक अनाथ झाल्यासारखे असून त्याला कोणीही वाली नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. याचा मोठा फायदा पोलीस प्रशासनातील काही मुजोर सुभेदारांनी उचलला आहे. कारण जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे नाशिकमध्ये तिरंगा रॅलीला उपस्थित होते. हि रॅली पंचवटी कारंजा, इंद्रकुंड, मालेगाव स्टॅन्ड मार्गे शहरातून सीबीएस येथे स्वातंत्र स्मारकामध्ये जाणार होती. दरम्यान पंचवटी कारंजा, इंद्रकुंड, मालेगाव स्टॅन्ड हा परिसर अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक अवैध धंदे आणि जुगारासह मटक्याचे अड्डे सुरु आहे. मंत्री गिरीष महाजन पायी रॅली करणार असल्याचे माहित असताना देखील पंचवटीतील एका मुजोर सुभेदाराने हे अवैध धंदे बंद ठेवण्याऐवजी सर्रास सुरु ठेवले होते. दरम्यान या रॅली शेकडो वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी होते. तरी अवैध धंदे राजरोसपणाने सुरु असल्याने पोलीस दलाच्या कार्यशैलीवर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधलेनगर येथील आंबेडकर वाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव आणि प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र, या हत्याकांडाच्या तपास योग्य दिशेने होत नसल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने पोलीस प्रशासनाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये फिर्यादीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना निलंबित करा, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सहआरोपी करणे हि महत्वाची मागणी करण्यात आली होती. तसेच, पोलीस उपनिरीक्षक गवळी यांना सहआरोपी करून सेवेतून बडतर्फ करा, गुन्हे शाखा एक मधील पोलीस कर्मचारी विशाल काठे, परदेशी याला सहआरोपी करा, अवैध धंदे चालक बाळू पाटील याला सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढता सहभाग धोकेदायक ठरणारा आहे. यामुळे नाशिककरांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचे दिसत आहे.





