अवैध धंद्याच्या हप्त्यासाठी एका युवकाचा खून !
तडीपार गुंडाकडून तडीपार गुंडाचा जेलरोड परिसरात खून !
शहरात तडीपार गुंडांचा सर्रास वावर असल्याचे निष्पन्न !अवैध धंदे सर्रास सुरु असल्याने गुन्हेगारीत वाढ !पोलीस प्रशासन सुस्त गुन्हेगार मस्त असल्याचे शहरात दुर्दैवी चित्र !
नाशिक : श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक या पावन भूमीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राक्षसांनी अक्षरशः शहराला वेठीस धरून धुमाकूळ घातला आहे. शहरात पोलिसांचे अस्तित्व आहे कि नाही असा प्रश्न दिवसाआड पडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे साहजिकच सामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. सिडको परिसरात खुनाचा बदला घेण्यासाठी एकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकरोड परिसरात अवैध दारू विकणाऱ्या कडून हप्त्याच्या स्वरूपात पैसे घेण्याच्या वादातून एका युवकाचा खून केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मारणारा आणि मरणारा दोघेही सराईत गुन्हेगार आणि तडीपार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे शहरात फक्त गुन्हेगारांचे अस्तित्व असल्याचे दिसून येत असून, वाढत्या गुन्हेगारीला फक्त अवैध धंदे कारणीभूत असल्याचे उघड होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेलरोड येथील मोरे मळा बालाजी नगर येथे दि. १ रोजी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान हितेश सुभाष डोईफोडे, २८ या तडीपार गुन्हेगाराची डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जेल रोड परिसरातील मोरेमळा बालाजी नगर येथे राहणारा रेकॉर्ड वरील तडीपार असलेला गुन्हेगार निलेश पेखळे याच्या घरी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सराईत तडीपार गुन्हेगार हितेश सुभाष डोईफोडे, २८, महाजन हॉस्पिटल मागे साने गुरुजी नगर, जेलरोड आणि त्याचा मित्र रोहित नंदकिशोर बंग, २८, रा. संजय गांधी नगर, जेलरोड, नाशिकरोड हे निलेशच्या घरी अवैध दारूच्या धंद्यातील पैशाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यात बाचाबाची होऊन भांडण झाले. यावेळी निलेश पेखळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी हितेश आणि रोहित यांना लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी निलेश याने हितेश याच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर रोहित याने आपला जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला आहे. सध्या रोहित याच्यावर नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्यात १८ टाके पडल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळावर जखमी हितेश हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्याने तो बेशुद्ध झाला आणि त्याच्या शरीराची हालचाल बंद झाल्याचे निलेश याच्या लक्षात आल्यानंतर त्यानेच त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हितेश याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती नाशिक रोड पोलिसांना समजतात पोलिसांनी हल्लेखोर निलेश पेखळे यांच्याशी संपर्क साधत त्याला पोलिसांना शरण घेण्यास सांगितले. यावेळी संशयित निलेश हा स्वतःहून नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
गेल्या वर्षभरापासून शहरात खुनांचे सत्र सुरु आहे. तर टोळीयुद्ध आणि खून का बदला खून म्हणत गुन्हेगार भर रस्त्यात प्राणघातक हल्ले करीत एकमेकांचे मुडदे पाडू लागले आहे. नाशिकच्या इतिहासात अशा प्रकारची गुन्हेगारी नाशिककरांनी कधीच अनुभवलेली नाही. त्यात गुन्हेगारी वाढलेली असताना पोलीस प्रशासनाकडून कोणतीच ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नाशिककरांच्या संतापात अधिकच भर पडत आहे. तर दुसरीकडे थेट पोलीस कर्मचाऱ्यांचाच गुन्हेगारीत सहभाग उघड होऊ लागल्याने पोलीस प्रशासन गोत्यात येऊ लागले आहे. त्यातच अजून गेल्या महिन्यात जाधव बंधूंच्या हत्येमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करीत त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रस्त्यावर उतरत पोलीस प्रशासनाविरोधात मोर्चा काढला होता. त्यामुळे पोलिसांची इभ्रत चांगलीच वेशीला टांगली गेली होती.
पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे गैरवर्तन आणि थेट खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात नावे येऊ लागल्याने त्यांच्याविरोधात कडक कारवाई होईल अशी आशा सर्वसामान्य नाशिककरांना वाटत होती. मात्र, सध्या जाधव बंधू खुनाच्या गुन्ह्यामध्ये म्हणावा तसा तपास होताना दिसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनातील खाकीच्या आडून गुन्हे करणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांच्या भावनांचा विचार करून खुनाच्या घटनेमध्ये ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली आहे. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. नाहीतर नागरिकांचा पोलिसांवरील असलेला विश्वास देखील उडाल्याशिवाय राहणार नाही.





