पोलीस आयुक्तालया बाहेर होणारे घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित !
पोलीस मात्र हप्ते घेण्यात व्यस्त !
नाशिक : नाशिकमधील सिडको परिसरातील अवैध धंदे विधानसभेत गाजले होते. तर पंचवटी परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पत्रव्यवहार केला आहे. याबाबत त्यांनी क्रांती दिनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अवैध धंदे बंद केले असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितल्याने घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, यामुळे पंचवटी परिसरातील अवैध धंदे चांगलेच राज्यभर गाजू लागले आहे असेच म्हणावे लागेल. अवैध धंद्यांविरोधात पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याने पोलीस प्रशासनावर आलेली नामुष्की टळली आहे. मात्र, असे असले तरी पंचवटी परिसरात आजही अनेक अवैध धंदे राजरोसपणाने सुरु असल्याने पोलीस हप्ते वसुलीत व्यस्त असल्याचे दिसत आहे.
अंबड परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु होते. याबाबत नाशिकचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी कुठलाच आवाज उचलत नसल्याने या अवैध धंद्यांविरोधात थेट नितेश राणे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून अवैध धंदे बंद करून याला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि सुभेदाराची बदली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची आणि सुभेदाराची उचलबांगडी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सध्या पंचवटी परिसरातील अवैध धंदे राज्यभरात चांगलेच गाजत आहे. या अवैध धंद्यांना राजाश्रय आणि पोलिसांचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास कोणीही धजावत नसल्याचे दिसत आहे.
याबाबत मुबईच्या काही माध्यम प्रतिनिधींनी नाशिकमध्ये येत वाघाडी आणि क्षीरसागर कॉलनी परिसरातील अवैध धंद्यांचे स्टिंग ऑपरेशन करून पंचवटी पोलिसांचे चांगलेच वाभाडे काढले होते. या अवैध धंद्यांबाबत तक्रार करणारे तक्रारदार दिलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई केली हे विचारण्यास जुलै महिन्यात पंचवटी पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर हल्ला घडवून आणण्यात आला होता. त्यामुळे जखमी झालेल्या तक्रारदारांनी मुंबई शहर येथील टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. मात्र, चोरालाच चौकीदारी करायला लावल्यास त्याचा काय उपयोग होणार हे नव्याने सांगायला नको.
पंचवटी परिसरातील वाघाडी, वाल्मिक नगर, मेरी मैदान आणि क्षीरसागर कॉलनीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत २१ आणि २९ जुलै रोजी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली होती. मात्र, त्यावर कुठलीच कारवाई न करता अवैध धंदे जोमात सुरु असल्याने देसाई यांनी पुन्हा मंगळवार दि. ६ रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना फोनवर संपर्क साधला असता आयुक्तांनी हा अवैध धंदा बंद केला असल्याचे सांगितल्याने शुक्रवार दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येणारे घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पंचवटी परिसरातील अवैध धंद्यांबाबत थेट पोलीस आयुक्तांना हस्तक्षेप करावा लागत असल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना मेल पाठवला असता त्यांच्याकडून कारवाई करण्यासंदर्भात उत्तर येते. मात्र, नाशिक पोलीस आयुक्त यांना पाठवलेल्या मेलला उत्तर दिले जात नाही हे कुठेतरी संशयास्पद आहे. पोलीस आयुक्तालयाच्या मेलवर अशा अवैध धंद्यांच्या तक्रारीबाबत येणारे मेल परस्पर डिलीट तर केले जात नाही ना ? या संशयकल्लोळामुळे आम्ही थेट आयुक्त कर्णिक सरांशी मोबाईलवर संपर्क साधला असता आणि त्यांनी अवैध धंदे बंद केल्याचे सांगितले. यापुढे संबंधित ठिकाणी अवैध धंदे सुरु झाल्याची तक्रार आल्यास आम्ही थेट नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयावर घंटानाद आंदोलन करू. : तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड 