आरोग्याच्या समस्यांनी रहिवाशी त्रस्त !
निलगिरी बाग येथे अस्वच्छतेचे साम्राज्य !
नाशिक : पंचवटी परिसरातील मनपाची घरकुल योजना असलेली निलगिरी बाग सध्या समस्यांनी वेढली आहे. याठिकाणी पाणी आणि कचरा साचल्याने डासांची उत्पत्ती वाढल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. तर, ठिकठिकाणी पाण्याचे तळे आणि चिखलाचे साम्राज्य झाल्याने पायी चालणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी याठिकाणी एकदा पाहणी करून नागरिकांना समस्या मुक्त करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने निलगिरी बाग येथे घरकुल योजना राबवली आहे. याठिकाणी शेकडो कुटुंब वास्तव्यास आहे. सध्या पावसाळा सुरु झाला असून सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने त्यात पाणी साचून तळे तयार झाले आहे. तर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून येथील नागरिकांना यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच ठिकठिकाणी कचरा आणि पाणी साचल्याने दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहे.
त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी एकदा याठिकाणी येऊन पाहणी करावी आणि औषध फवारणी करून परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. लवकरच येथील समस्या सोडविल्या नाहीतर आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.





