भारतीय ज्ञानपरंपरा जपणे आवश्यक : देशमुख
गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे १०० संस्थांचा सन्मान !
नाशिक : मानवी जीवनाला मार्गदर्शक असणारी भारतीय ज्ञानपरंपरा जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रकाश देशमुख यांनी केले. वैदिक सम्राट श्रीकृष्ण शास्त्री गोडशे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान या संस्थेतर्फे शंकराचार्य न्यास सभागृहातआयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, लोकहितवादीचे जयप्रकाश जातेगावकर, खादी ग्रामोद्योगचे पद्माकर पाटील होते. अध्यक्षस्थानी संस्कृत सभेचे देशमुख होते. गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र पैठणे यांनी दिली. जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष डाॅ. विश्वास देवकर यांनी प्रास्ताविकात नियोजित उपक्रम सांगितले. संस्कृत सभेतर्फे नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.
या समारंभात काळाराम मंदिर संस्थान, सार्वजनिक वाचनालय, लोकहितवादी मंडळ, संस्कृत भाषा सभा नाशिक, स्वामी अखंडानंद वेद वेदांग विद्यालय, कल्पतरू वेदपाठ शाळा, आयुर्वेद सेवा संघ नाशिक, खादी ग्रामोद्योग, सार्वजनिक वाचनालय पंचवटी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र नाशिक, पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर, पुरोहित प्रतिष्ठान संगमनेर, त्र्यंबकेश्वर देवस्थान, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय मुंबई आदी संस्था व शंभर गुणीजनांचा गोदावरी पाठशाळेतर्फे शाल, श्रीफळ, ग्रंथ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाश महाराज प्रभुणे, लीना हुन्नरगीकर, डॉक्टर संजय गवळी, शोभा गोसावी, अतुल तरटे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमृता कवीश्वर यांनी केले तर गोविंद पैठणे यांनी आभार मानले.





